Publish Date: Mon, 22 May 2023 (08:51 IST)
Updated Date: Mon, 22 May 2023 (08:56 IST)
सत्तेचा उपयोग लोकांच्या हितासाठी न करता जातीजातींमध्ये वाद वाढवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर (BJP) केला आहे. अहमदनगर येथील हमाल मापाडी संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. लोकहितापेक्षा वाद निर्माण केले जातात असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, “अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून बाजारपेठ बंद होती. या भागात जातीजातींमध्ये अंतर निर्माण करण्याचं तसेच जातीजातीत संघर्ष निर्माण करण्याचे काम एक अदृष्य शक्ती करत आहे. पुरोगामी जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची विशेष ओळख आहे. अनेक ऐतिहासिक मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले आहे. पण त्याच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती. त्यामुळे अशा प्रकारे जातीजातींमध्ये वाद घडवणाऱ्या शक्तीला विरोध करण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे नाही तर सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “समाजातील चित्र बदलत असून कर्नाटकमध्ये याची सुरवात झाली आहे. कर्नाटकात धनगर समाजाचा मुख्यमंत्री झाला. हे शक्य झालं केवळ कष्टकऱ्यांच्या एकजुटीमुळे. कर्नाटकमध्ये अशी एकजूट होऊ शकते तर देशातील इतर राज्यात का नाही ?” असा सवालही शरद पवार यांनी विचारला.
Edited By - Ratnadeep ranshoor