Publish Date: Tue, 10 Feb 2026 (18:39 IST)
Updated Date: Tue, 10 Feb 2026 (18:43 IST)
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकार कडून ऐतिहासिक निर्णय घेत त्यांना आर्थिक, मानसिक सामाजिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कृतीदल असणार. या दलात कृषी तज्ज्ञांसह मानसिक आरोग्यावर काम करणारे, संशोधक, कृषी समाजशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश असणार. त्यात शिवार फाउंडेशनचे डॉ.विनायक हेगाणा आणि सृष्टी डोईजड यांचा विशेष सदस्य म्हणून समावेश असणार आहे.
या टास्कफोर्सचा मुख्य उद्देश्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन करणे.
हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत त्यावर उपाय योजना सुचवणे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपयोजना करणे.
शेतीचे तंत्रज्ञान, आर्थिक साहाय्य, सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मक पद्धती विकसित करणे.
विभागीय आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे.
विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे.
आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीच्या उपाययोजना आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती करणे आहे.
तसेच शेतकऱ्यांनी केवळ आर्थिक अडचणींमुळे नव्हे, तर मानसिक अस्थैर्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी हे टास्क फोर्स गावपातळीवर जाऊन समुपदेशन आणि मार्गदर्शनाचे काम करेल.