Publish Date: Fri, 14 Jan 2022 (08:13 IST)
Updated Date: Fri, 14 Jan 2022 (08:22 IST)
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भरणारी पौषवारी शासनाने रद्द केली असली तरी राज्यभरातून दिंड्या त्र्यंबकेश्वरला दाखल होत २८ जानेवारी रोजी होणा-या वारी पूर्वीच १५ दिवस अगोदर दिंडया येत आहेत. नगर, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, पुणे यासह नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी पायी दिंडीने किमान दोन लाख वारकरी पायी येत असतात. जवळपास ५०० ते ६०० दिंडयांची नोंद होत असते. यावर्षी कोविडच्या कारणाने वारी रद्द झाली. मात्र वारकरी भाविक पाच दहाच्या जथ्याने पायी येत आहेत. एक दिवस मुक्काम करून पुन्हा परतीचा प्रवासाला सुरूवात करत आहेत. सोबत विणा झेंडे यासह पालखी ठेवलेले रथ देखील दिसून येतात. नाथांच्या मंदिरात फुगडया घालत अभंग म्हणत आपली सेवा रूजू करतात. वारी बंद असेल म्हणून काय झाले त्र्यंबकेश्वर येथील प्रत्येक दिवस वारीचाच आहे.नाथांच्या समाधी दर्शनाने कृतार्थ होत आहोत. ब्रह्मगिरीच्या दर्शनाने आणि कुशावर्तातील गोदामायीच्या स्पर्शाने गहीवरून येत असल्याच्या भावना वारकरी व्यक्त करतात.