Publish Date: Tue, 26 Feb 2019 (08:44 IST)
Updated Date: Tue, 26 Feb 2019 (08:45 IST)
पुण्यात कर्णबधीर तरुणांच्या मोर्चावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचा आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिला आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले. तर दुसरीकडे पोलिसांच्या लाठीमारानंतर आंदोलनकर्ते कर्णबधिर पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या देऊन बसले आहेत. आता त्यांचे प्रतिनिधी मुंबईला जाणार आहेत. मुंबईत सरकारकडून कर्णबधिरांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन थांबवले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.