Publish Date: Tue, 13 Apr 2021 (15:33 IST)
Updated Date: Tue, 13 Apr 2021 (15:35 IST)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते. पण लोकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र दोन दिवसांनी होईल, अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या भीतीने गावी परतत असलेल्या परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्रातच थांबण्याचे आवाहन केले. राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी सध्या हे मजूर भटकंती करत आहेत. या मजुरांनी मंगळवारी प्रतापनगर भागात गर्दी केली होती. सध्या लॉकडाऊनच्या शक्यतेने मजुरांना फार काम मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या मजुरांना वणवण करावी लागत आहे.