Publish Date: Mon, 11 Oct 2021 (15:46 IST)
Updated Date: Mon, 11 Oct 2021 (15:47 IST)
येत्या 2 दिवसांमध्ये मोसमी वारे माघारी जाणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मोसमी वारे परतीला जाण्यासाठी पूरक वातावरण असून, याचे परिणाम राज्यातील काही भागांवर दिसून येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सोमवार आणि मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मोसमी वारे माघारी जात असतानाही राज्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हवामान विशेषज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करत रत्नागिरी भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला. राज्यात यंदा वाजवीपेक्षा अधिक काळासाठी मुक्कामी असणाऱ्या पावसानं परतीच्या वाटा धरल्या असल्या तरीही जाता जाता हा वरुणराजा त्याचा तडाखा दाखवणार हेच आता स्पष्ट होत आहे.