Publish Date: Sat, 27 Nov 2021 (21:40 IST)
Updated Date: Sat, 27 Nov 2021 (21:41 IST)
महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा कितपत प्रभाव पडेल या प्रश्नावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे महत्त्वाचं विधान केले आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा परिणाम दिसत नाही. दुसरी लाट डेल्टा व्हेरिएंटमुळे आली होती. तिसरी लाट या नव्या व्हेरिएंटमुळे येण्याची शक्यता आहे. पण आपण वेळीच त्याला रोखलं तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु सतर्क राहणं गरजेचे आहे असं टोपे म्हणाले.
ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता राज्य सरकार १ डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार का? यावर राजेश टोपे म्हणाले की, १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्रालयाला तसा प्रस्ताव पाठवला. त्यावर हिरवा कंदील देण्यात आला. सध्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता नाही. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल. त्यामुळे पुढील निर्णय घेतला जाईल असे संकेत राजेश टोपेंनी दिले आहेत.