Publish Date: Thu, 03 Feb 2022 (15:18 IST)
Updated Date: Thu, 03 Feb 2022 (15:20 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून या परीक्षा पार पडणार आहेत. सदर परीक्षा विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्याच केंद्रावर घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठीही मंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये जरी परीक्षा जवळील शाळांमध्ये होणार असल्या तरी तिथे बैठे स्कॉड असणार आहेत.
यावर्षीच्या दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहेत. राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला १४ लाख ७२ हजार ५६२ तर दहावीच्या परीक्षेला १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने पुरेपुर काळजी घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.