Publish Date: Tue, 18 Feb 2020 (16:42 IST)
Updated Date: Tue, 18 Feb 2020 (16:44 IST)
“दलित, आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा डाव असून, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. “पुरोगामी व्यासपीठ असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे, चौकशी करणे चुकीचं आहे. कोणाविरोधात पुरावे असतील तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून झाला त्यामुळे पुरोगामी विचारवतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनआयएकडे तपास देण्याची वेळ पाहिली तर सगळा तपास संशयास्पद वाटत आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
कोणी वेगळं वागलं असेल, काही पुरावा असेल तर त्याची बाजू आम्ही घेणार नाही. परंतु जे कवी होते, विचारवंत होते, त्यांनी पुरोगामी विचार मांडला. त्यांची चौकशी विचार करायला लावणार आहे. दाभोळकरांना मारलं गेलं, कलबुर्गींना मारलं गेलं, पानसरेंची हत्या झाली. या पुरोगामी विचारवंतांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतं. असंही वाटतं की जी पुरोगामी चळवळ, दलित, आंबेडकरवादी चळवळ आहे तिलाच नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव आहे का? हे सर्व काळजीचं वाटतं. एनआयएकडे तपास देणे, तिचा वेळ-काळ हे संपूर्ण पाहिलं, तर सगळा देश-समाज सर्वजण त्याकडे काळजीच्या स्वरुपाने पाहतोय, संशयाच्या स्वरुपाने पाहतोय, असं थोरात म्हणाले.