Publish Date: Sat, 06 Jul 2019 (16:23 IST)
Updated Date: Sat, 06 Jul 2019 (16:24 IST)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्याच्या निषेधार्थ जबाबदार सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रविकांत वर्पे आणि सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात निषेध नोंदवला. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधीत खात्याचे मंत्री यांच्यावर करवाई व्हावी असे निवेदन दिले.तिवरे धरणाला काही वर्षापासून तडे गेले होते. स्थानिकांनी त्या संबध विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून आज निष्पाप २३ जणांचा बळी गेला. शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच, उलट या खात्याचे केबिनेट मंत्री तान्हाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहे. खेकड्यांमुळे धरण फुटले सांगून अंगकाढू पणा हे सरकार करत आहे. खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने केली.