Publish Date: Sat, 28 Mar 2020 (22:47 IST)
Updated Date: Sat, 28 Mar 2020 (22:54 IST)
सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक रोखण्यात येत आहे. अशाच नाकाबंदीत पोलिसांनी हिंगोलीतील शेतकरी बाळू पाटील यांचा ट्रक अडवला. बाळू पाटील यांची संत्रीची फळबाग आहे. बाळू पाटील यांना आपल्या शेतातील नऊ टन संत्री बंगळुरुला पाठवायचा होता. परंतू करोनामुळे जिल्ह्यांच्या सीमा सील असल्याने ट्रक अडवण्यात आला. पोलिसांच्या भीतीपोटी चालकानेही पळ काढला. यानंतर बाळू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मेसेज केला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली.
उद्धव ठाकरे यांनी तात्काळ या मेसेजची दखल घेतली. त्यांनी लगेच परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना फोन केला आणि शेतकऱ्यांची अडवणूक करुन नका असं सांगत ट्रक सोडण्याचा आदेश दिला. यानंतर बाळू पाटील यांचा ट्रक बंगळुरुच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला.
बाळू पाटील हे शिवसैनिक आहेत. पण त्यांनी आपल्या मेसेजमध्ये कुठेही आपण शिवसैनिक असल्याचा उल्लेख केला नव्हता. तरीही उद्धव ठाकरे यांनी तात्काल मदत केली याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने आपल्याला देव भेटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.