Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे : 'स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे'

उद्धव ठाकरे : 'स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे'
, शनिवार, 19 जून 2021 (19:11 IST)
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषण करत आहेत. व्हर्च्युअल माध्यमातून उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
शिवसैनिकांच्या आयुष्यात तीन सण असतात. बाळासाहेबांचा जन्मदिन, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि मार्मिकचा वर्धापन दिन, असं प्रमोद नवलकर म्हणायचे.
गेल्या 55 वर्षात शिवसेनेनं अनेकांचं रंगही पाहिल आणि अंतरंगही पाहिलेत.
सत्ता न मिळाल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय.
स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये.
स्वबळ हे अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं असावं
स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे
न्याय-हक्कांसाठी स्वबळ हवं, केवळ निवडणुकीसाठी नको
मराठी म्हणणं जसं कमीपणाचं लक्षण होतं, तसं हिंदुत्त्वाचा उच्चार करतानाही भल्याभल्यांना कापरं भरत होतं, तेव्हा शिवसेना म्हणाली, गर्व से कहो हम हिंदू है
हिंदुत्त्व आमचं राष्ट्रीयत्व आहे, हे लक्षात घ्या

एक देश आणि अनेक भाषा असं जगाच्या पाठीवर आपण एकमेव आहोत, एकत्रीकरण ही भारताची ताकद आहे.
देशावर प्रेम करा सांगणारा शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही
गेल्या काही दिवसात शिवसेनेशी संबंधित महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर शिवसेनेवर झालेले आरोप असो वा दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवनाबाहेर भाजपच्या आंदोलनामुळे झालेला गोंधळ असो, उद्धव ठाकरे यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य करणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे..
 
कोरोनाची स्थिती सुधारत गेली आणि निवडणूक आयोगानं ठरवल्यास आठ-नऊ महिन्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक होणं अपेक्षित आहेत. हे लक्षात घेऊन, मुंबईतल्या विविध मुद्द्यांवरून भाजप आधीच आक्रमक झालीय.
 
त्यात दोन-तीन दिवसांपूर्वी शिवसेना भवनाबाहेर झालेल्या आंदोलनामुळे तर सेना-भाजप यांच्यात मुंबईत कसा सामना रंगणार आहे, याचं संकेतच मिळाले आहेत. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता वर्तवली जातेय.
तसंच, सिंधुदुर्गातही आज (19 जून) शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पेट्रोल विक्रीच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे एकूणच भाजप विरूद्ध शिवसेना हा सामना रंगत जाताना दिसतोय.
 
दुसरीकडे, गेल्या वर्धापन दिनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी जाहीर संवाद साधला नाहीय. त्यामुळे आजच्या भाषणातून ते काय बोलतात, हे पाहावं लागेल.
आगामी काळात केवळ मुंबईच नव्हे तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
त्याचसोबत, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सध्यातरी सुरळीत सुरू असलं तरी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप हे सातत्यानं स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. किंबहुना, भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं तर महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेविरोधातम मोर्चाच उघडला आहे. दररोज भाई जगताप शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील कामगिरीवर टीका करताना दिसतात. त्यामुळे या मुद्द्यांसह एकूणच महाविकास आघाडीच्या वाटचालीवर उद्धव ठाकरे काही बोलणार का, हेही पाहवं लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश