Publish Date: Mon, 03 Dec 2018 (08:55 IST)
Updated Date: Mon, 03 Dec 2018 (08:56 IST)
इथे इतकी गर्दी झाली आहे की तुम्ही तुमच्या लोकांना सांगायला हवं की भाईसाब अब मत आना. एकेकाळी इथे दक्षिणेतून लोकं यायचे. १९६०मध्ये दक्षिणी लोकांविरोधात मुंबईत मोठा संघर्ष झाला. पण नंतर हळूहळू तिकडच्या राज्यकर्त्यांनी तिथे उद्योग आणि रोजगार आणले. आता तिथून लोकं येत नाहीत. तुमच्याकडे रोजगार नाहीत, पण आजही या महाराष्ट्रात लाखो लोकं असे आहेत ज्यांना रोजगार नाहीये. त्यांना माहितीही नाही की कामं कुठे आहेत? आणि जेव्हा असं कळतं की इथल्या उद्योगांमध्ये बाहेरची लोकं भरली जात आहेत, तर मग संघर्ष होणार की नाही?
पहिल्यांदाच राज ठाकरेंनी हिंदीतून भाषण केलं. आणि विशेष म्हणजे तेही उत्तर भारतीयांच्या पंचायतीमध्ये! यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय विश्वामध्ये सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही आगामी निवडणुकांची नांदी तर नाही ना? अशीच काहीशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. मुंबईतले उत्तर भारतीय आणि त्यांचे प्रश्न, तसेच मराठी आणि परप्रांतीय वाद यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
देशात कुठेही जाऊन नोकरी करता येते राहता येते असं सांगितलं जाते पण यासाठी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्या इथं कुणीही करत नाही. तुम्ही इतर राज्यात जातात, मार खातात, संघर्ष करतात, अत्याचार सहन करतात. तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही? तुम्ही तुमच्या सत्ताधाऱ्यांना जाब का विचारत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांना विचारला.आम्ही जेव्हा रेल्वे भरतीत आलेल्या तरुणांना मारहाण केली तेव्हा अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारले. पण तेव्हा रेल्वे भरतीची जी काही जाहिरात असते तरी उत्तरप्रदेशमधील दैनिकांमध्ये देण्यात आली होती. त्यामुळे आमच्या मराठी मुलांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. जेव्हा आम्ही एवढ्या संख्येनं येणाऱ्या उत्तरभारतीय तरुणांना विचारलं तर तेव्हा त्यांनी जशी भाषा वापरली त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. जर आमची मुलं उत्तरप्रदेशमध्ये आली असती तर त्यांनी अशी भाषा वापरली असती तर तुम्ही काय केलं असतं?असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला.फेरीवाल्यांना जेव्हा आम्ही मारहाण केली तेव्हा उत्तरभारतीय नेत्यांनी जी भाषा वापरली त्यातून संघर्ष झाला. मुळात तुमच्या काही नेत्यांनी आग लावली तेव्हा हे प्रकरण तापलं. जेव्हा उत्तरभारतातून रेल्वे भरतीसाठी मुलं आली त्यांना आम्ही प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जसे उत्तर दिले त्यामुळे संघर्ष पेटला.आम्ही काही आंदोलन केलं की प्रश्न विचारले जातात. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये उत्तरभारतीयांना मारहाण करून परत पाठवण्यात आले होते. अगदी रेल्वेत बसवून देण्यात आले. त्यावेळी कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं नाही. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही जरा त्यांनाही याच जाब विचारा असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.