Publish Date: Tue, 10 Jul 2018 (09:03 IST)
Updated Date: Tue, 10 Jul 2018 (09:05 IST)
विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सत्ताधारी भाजप विधानपरिषदेमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. भाजपचं विधानपरिषदेतलं संख्याबळ २१ झालं आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ १७ आमदारांपर्यंत घटले आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांची संख्या समान झाली आहे. २०१४ सत्तेत आल्यानंतर म्हणजेच साडेतीन वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. याआधी भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच मैदानात उरले. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे ११ जागांसाठी उमेदवारांची संख्या १२ झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र, देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस टळली.
विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल
भाजपा- २१
राष्ट्रवादी काँग्रेस -१७
काँग्रेस-१७
शिवसेना- १२
जदयू- १
आरपीआय कवाडे गट-१
शेकाप-१
रासप-१
अपक्ष-१
रिक्त-१