Publish Date: Fri, 25 Sep 2020 (17:01 IST)
Updated Date: Fri, 25 Sep 2020 (17:04 IST)
शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते, तर अधिक बरे वाटले असते, असा टोला भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे.
“शरद पवार स्वतः कृषिमंत्री होते. त्यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही” असा घणाघात विनोद तावडेंनी केला. कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणली, अशा शब्दात तावडेंनी स्तुति केली.
राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर शरद पवारांनी संताप व्यक्त केला होता. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन सदनाचं अवमूल्यन करणारं असल्याचं सांगत पवारांनी 22 सप्टेंबरला एक दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं.