Publish Date: Wed, 29 Jun 2022 (17:09 IST)
Updated Date: Sat, 15 Oct 2022 (13:24 IST)
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2022: 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यास सांगितले आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्यात राजकीय वातावरण तापत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. आयोगाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई कायदा क्र. 3) कलम 10A उपकलम (4) अन्वये आपल्या अधिकारांचा वापर करून 271 ग्रामपंचायत निवडणुका घोषित केल्या आहेत.
5 जुलैपासून लागू होणार आहे आचारसंहिता
5 जुलैपासून निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युद्ध रंगणार आहे. विशेष म्हणजे राज्यात 28,813 ग्रामपंचायती आहेत, जिथे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.