Publish Date: Thu, 22 Sep 2022 (07:44 IST)
Updated Date: Thu, 22 Sep 2022 (07:46 IST)
ये पब्लिक है सब जानती है, गद्दार कोण खुद्दार कोण? जनता जाणते. आरोप प्रत्यारोप करत राहू द्या, दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही गेलात म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एका तरी गट प्रमुखाला रोजगार मिळाला का? त्यांना मुंबईत येणे-जाणेही परवडत नव्हते. कधी त्यांचा विचार केला का? मी नगरविकास खात्यातून १-२ कोटी निधी दिला आणि काम करा म्हणून सांगितले. मी देण्याचे काम करतो, काही जण फक्त घेण्याचे काम करतात. मी देनेवाला आहे म्हणून मी मुख्यमंत्री बनलो. आता आम्हाला खोके बोलत आहात, वेळ आल्यावर सगळे सांगेन. माझ्याशिवाय चांगला हिशेब कुणाकडे असणार, ते मी दिल्लीत नाही महाराष्ट्रात सांगणार, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेत २०-२० वर्षे विविध राज्यांत शिवसैनिक काम करत होते, मात्र त्यांना पक्ष नेतृत्वाची साधी भेटही मिळत नव्हती, त्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे कार्य केले आहे. अडीच वर्षांत आमचा मुख्यमंत्री असूनही आमच्या शिवसैनिकांवर तडीपारी, जेल मिळत होत्या. मी शक्य तितके मदत करत राहिलो. ज्यांची जबाबदारी होती, ते मदत करत नव्हते. आमचा नेता मुख्यमंत्री पदावर असतानाही आमच्याच लोकांवर अन्याय होत होता, अन्यायाची परिसीमा गाठली गेली. त्यामुळे आम्ही उठाव केला. आम्ही जर चुकीची भूमिका घेतली असती तर लाखो लोक आमच्या मागे उभे राहिले नसते, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.