Publish Date: Sat, 20 Mar 2021 (16:35 IST)
Updated Date: Sat, 20 Mar 2021 (16:37 IST)
इयत्ता दहावीची २९-४-२०२१ ते २०-५-२०२१ दरम्यान होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर २३-४-२०२१ ते २१-५-२०२१ दरम्यान होणारी बारावीची परीक्षा देखील ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. अशी महत्वाची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत दिली. यासह त्यांनी असेही सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात देता येणार आहे.
नेहमी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ३ तासांचा कालवधी असतो मात्र यंदा तो कालावधी ३० मिनिटांनी अधिक वाढवून देण्यात आलेला आहे. याबरोबर ४० आणि ५० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी १५ मिनिटांचा कालावधी वाढून देण्यात आला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचीही माहिती शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिली. यासोबतच, दहावी, बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा (प्रॅक्टिक्ल परीक्षा) ही लेखी परीक्षेनंतर असाईनमेंट पद्धतीने होणार आहे. विशेष म्हणजे असाईनमेंट या लेखी परीक्षेनंतर शाळेतच गृहपाठ पद्धतीने विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.