Publish Date: Thu, 13 Oct 2022 (15:03 IST)
Updated Date: Thu, 13 Oct 2022 (15:05 IST)
८० टक्क्याहून अधिक बहुमत आमच्याकडे असताना शिवसेना-धनुष्यबाण आम्हालाच मिळायला हवं होतं. किती दिवस लोकांसमोर रडणार आहे. शिवसेना नाव लावताना सारखं सारखं रडून तुम्ही अपमान करताय. विजय झाला तर बाळासाहेबांचा आशीर्वाद म्हणायचा. पराभव झाला तर आम्हाला, केंद्रीय यंत्रणांना दोष द्यायचा ही कार्यपद्धती आहे असं सांगत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून केवळ रडीचा डाव खेळला जातोय. आमच्यावर अन्याय झाला असं सातत्याने रडायचं लोकांची सहानुभूती मिळवायची हा एकमेव उद्योग त्यांच्याकडे राहिला आहे. गेली ३ महिने पदउतार होण्यापासून आतापर्यंत माझ्यावर अन्याय होतोय अशारितीने लोकांसमोर जायचं आणि सहानुभूती मिळवायची. आपलं कर्तृत्व काही नाही केवळ रडणे आणि रडणे आता लोक त्यावर विश्वास ठेवत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर चिन्ह, नाव लोकांसमोर स्वत: फेसबुक लाईव्हमधून जाहीर केले आणि निवडणूक आयोगावर आरोप करायचे. शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यापासून अन्याय होतोय असं रडगाणं सुरु होते. हायकोर्टानं शिवाजी पार्क वापरण्यास दिल्यावर फटाके वाजवले. दुटप्पी भूमिकेतून आपल्या बाजूने निर्णय झाल्यास विश्वास आहे बोलायचं आणि आपल्या बाजूने निर्णय न झाल्यास आरोप करायचे हे काम ठाकरे गटाकडून सुरू आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor