जळगाव - मी बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल. त्यामुळे मी बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नाही. मात्र पक्षातील गद्दारांना बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल, असे परखड मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
येथील बाबा हरदासराम सभागृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत खडसे बोलत होते. ते म्हणाले, पक्षाच्या बळकटीसाठी मी गेली अनेक वर्षे कष्ट केले आहेत. मी विरोधकांचे वार आणि तलवारही झेलली आहे. वेळोवेळी मीच पुढे झालो आहे. मी निष्कलंक असतांनाही माझ्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. मी पुरावा मागत असतानाही आजपर्यंत पुरावा समोर आणला नाही. हा सर्व ठरवून केलेला कट आहे. परंतु मी जर बोललो तर संपूर्ण भारत हादरून जाईल, त्यामुळे मी बोललो नाही, आणि भविष्यातही बोलाणार नाही. मात्र पक्षातील अशा गद्दारांना पक्षाने बाहेर काढण्याची गरज आहे अन्यथा पक्ष कमकुवत होईल, असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले.