दुष्काळग्रस्तांसाठीच्या कैवाराचा मोठा गाजावाजा करत मिरजेहून लातूरच्या जनतेची तहान भागविण्यासाठी रेल्वेने पुरवण्यात आलेल्या पाण्याचं 4 कोटी रुपयांचं बील रेल्वेने शासनाला पाठविले आहे. यावरुन तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
‘जलदूत’ने लातूरला पाणी दिल्याचं 4 कोटींचे बिल लातूरच्या जिल्हाधिकार्यांना नुकतेच मिळाले आहे. या बिलाची रक्कम कोणी द्यायची यावरुन संभ्रम निर्माण झाला. शिवाय मोठा गाजावाजा करुन दुष्काळग्रस्तांना दिलेल्या पाण्याच्या प्रयत्नावरही पाणी फेरले गेले. रेल्वे मंत्रालयावर टीका सुरु झाली होती.
दरम्यान, हे बिल राज्याला मिळालेल्या दुष्काळनिधीतून दिले जाणार असल्याले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, रेल्वेनेही ट्वीटच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिले आहे. जलदूत एक्स्प्रेसच्या खर्चाचा भार रेल्वेकडून उचलला जाणार होता. मात्र, राज्य सरकारने विनंतीवरुनच जलदूत एक्स्प्रेसचा खर्च निम्मा-निम्मा भागवणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.