Publish Date: Thu, 02 Apr 2026 (06:58 IST)
Updated Date: Thu, 02 Apr 2026 (07:48 IST)
हनुमान जयंती म्हणजे केवळ शक्तीची उपासना करण्याचा दिवस नाही, तर हनुमंताच्या गुणांचा आदर्श आपल्या आयुष्यात उतरवण्याचा दिवस आहे. रामायणातील प्रत्येक प्रसंगात हनुमानाने आपली बुद्धिमत्ता आणि संयम सिद्ध केला आहे. आजच्या धावपळीच्या युगात, जिथे नात्यांमध्ये दुरावा आणि जीवनात ताण वाढला आहे, तिथे मारुतीरायाची जीवनसूत्रे आपल्याला नवी दिशा देऊ शकतात.
बघूया हनुमंताकडून आपण काय शिकू शकतो:
१. 'मी' पणाचा त्याग आणि समर्पण
हनुमान हे अफाट शक्तीचे स्वामी होते, पण त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. ते स्वतःला नेहमी 'रामाचा दास' म्हणवून घेत. आपल्या नात्यांतही जेव्हा 'मी' पणा येतो, तेव्हा वादाला सुरुवात होते. जर आपण नात्यात थोडं नम्र राहिलो आणि समर्पणाची भावना ठेवली, तर कोणतंही नातं तुटण्याऐवजी अधिक घट्ट होतं.
२. संकटसमयी डगमगू नका
जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र ओलांडायचा होता किंवा लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर द्रोणागिरी पर्वत आणायचा होता, तेव्हा हनुमानाने कधीही "हे मला जमणार नाही" असे म्हटले नाही. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी डगमगून न जाता, त्यावर उपाय शोधण्याची वृत्ती आपण त्यांच्याकडून शिकली पाहिजे.
३. संवाद चातुर्य
हनुमान जेव्हा पहिल्यांदा प्रभू रामाला भेटले, तेव्हा त्यांच्या बोलण्यातील स्पष्टता आणि नम्रता पाहून राम थक्क झाले होते. नात्यांमध्ये अर्ध्याहून अधिक वाद हे चुकीच्या संवादामुळे होतात. समोरच्या व्यक्तीशी कधी, काय आणि कसे बोलावे, हे हनुमंताच्या 'वाक्चातुर्या'तून शिकण्यासारखे आहे.
४. विश्वासार्हता आणि निष्ठा
प्रभू राम आणि हनुमान यांचे नाते हे विश्वासाच्या सर्वोच्च शिखरावर होते. प्रभू रामांना माहित होते की, मारुतीवर सोपवलेले काम कधीच अपूर्ण राहणार नाही. आजही समाजात अशाच व्यक्तींची गरज आहे, ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आपल्या मित्रांशी किंवा जोडीदाराशी असलेले नाते हे अशाच निष्ठेवर आधारलेले असावे.
५. शक्तीसोबतच बुद्धीचा वापर
हनुमानाला 'बुद्धिमतां वरिष्ठम्' म्हटले जाते. सुरसा राक्षसीच्या मुखात शिरून बाहेर येताना त्यांनी केवळ बळाचा वापर केला नाही, तर चतुराई दाखवली. आयुष्यात फक्त शारीरिक किंवा आर्थिक ताकद असून चालत नाही, तर ती कुठे आणि कशी वापरायची याची जाण असणे गरजेचे आहे.
मारुतीरायाचे जीवन आपल्याला शिकवते की, शक्ती ही सेवेसाठी असावी, बुद्धी ही कल्याणासाठी असावी आणि भक्ती ही निस्वार्थ असावी.