भारतीय क्रिकेट संघाने कोलकाताचा रोमहर्षक कसोटी सामना जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनात आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला. या विजयामुळे पहिल्या क्रमांकावर कायम असलेल्या भारतीय संघाला 1 लाख 75 हजार डॉलरचा घसघसीत रक्कमेचा आयसीसीचा पुरस्कारही मिळणार आहे. या पुरस्कारापेक्षा क्रिकेट रसिकांना अव्वल नंबरचा आनंद महेंद्रसिंह धोनीच्या संघाने दिला हे महत्वाचे आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे. त्यानंतरही अर्थपूर्ण कमाईमुळे टी-20 आणि एकदिवसीय सामन्याच्या आयोजनाकडेच बीसीसीआयचे लक्ष होते. या दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धची कसोटी सामना जिंकून भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच अव्वल स्थानावर विराजमान झाला. परंतु हे स्थान औटघटकेचे ठरण्याची शक्यता होती. कारण भारतीय संघ वर्षभरात खूप कमी कसोटी सामने खेळणार होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनीसह आजी, माजी खेळाडूंनी अधिक कसोटी खेळण्याची मागणी बीसीसीआयकडे केली. तसेच जागतिकस्तरावरही वर्षभरात दोन कसोटी खेळून भारतीय संघ अव्वल कसा राहील, अशी टीका होऊ लागली. अखेरी दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्यात बदल करुन पाच एकदिवसीय ऐवजी तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआयने आपली भूमिका पार पाडली. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतून अव्वल स्थानाचा निर्णय होणार होतो.यामुळे चेंडू धोनी आणि सहकार्यांच्या कोर्टात होता. परंतु नागपूर कसोटीत डावाने पराभव झाल्यामुळे भारत अव्वल स्थान गमाविणार अशी भीती निर्माण झाली. बीसीसीआयने ऐनवेळी खेळलेली खेळी आपल्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कोलकाता कसोटी 'जिंकू किंवा मरु' या परिस्थित पोहचली. कसोटीत गोलंदाजांनी चोख भूमिका बजावत आफ्रिकेची फलंदाजांना पहिल्या दिवशी वेसण घातले. त्यानंतर भारतीय संघाने धावांचा डोंगर उभा केला. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि महेंद्रसिंह धोनीने शतकी खेळी करुन भारतीय बाजू भक्कम केली. पहिल्या डावात चांगली आघाडी मिळाल्यामुळे आफ्रिकेवर दुसर्या डावात दबाव निर्माण झाला. परंतु चौथ्या दिवशी पाऊस त्यांच्या मदतीला आला. पावसाप्रमाणे हाशिम आमलाही भारताच्या विजयात अडसर ठरत होतो. यामुळे सामन्याच्या शेवटच्या दिवशी एकदिवसीय किंवा ट्वेंटी-20 सामन्याप्रमाणे कसोटी रंगतदार झाली. कसोटीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरावा लागला. आफ्रिकेच्या शेवटच्या तीन फलंदाजांनी 53.3 षटके भारतीय गोलंदाजांना झुंजविले. नववा फलंदाज बाद झाला तेव्हा 22 षटकांचा खेळ शिल्लक होतो. यामुळे विजयाची औपचारिकता बाकी असा समज सर्वांचा झाला होतो. परंतु आमला आणि मॉर्केल यांनी कमालीची जिगर दाखविली. प्रत्येक षटकानंतर क्रिकेट रसिकांच्या ह्दयाचे ठोके वाढत जात होते. शेवटी दोनच षटक शिल्लक होते. यामुळे आमला आणि मॉर्केल ही कसोटी अनिर्णीत राखून भारताचा ताज हिसकाविणार अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु या षटकात भज्जीने कमाल केली. त्याने ऑफब्रेकवर मॉर्केलला पायचित केले आणि सारा स्टेडियम जल्लोषात बुडाला. केवळ नऊ चेंडू शिल्लक असताना भारताला चित्तथरारक कसोटी विजय मिळविला. कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली तरी त्याचा हिरो आफ्रिकेचा भारतीय वशांचा फलंदाज हाशिम आमला ठरला. दुसर्या डावातील 123 धावांच्या खेळीत आठ तास 31 मिनटे तो खेळपट्टीवर होतो. त्यापूर्वी पहिल्या डावात तीन तास 48 मिनटात 114 धावा त्याने केल्या होत्या. नागपूर कसोटीत 253 धावांची खेळी करताना 11 तास 25 मिनटे त्याने खेळपट्टीवर घालविले. दोन्ही सामान्यात 23 तास चार मिनटे फलंदाजी करताना त्याने 490 धावा केल्या. यामुळेच या मालिका रोमहर्षक झाली आणि शेवटी गोड झाला.