एखाद्या जलदगती गोलंदाजाला शोभेल अशी त्याची देहयष्टी आहे. शिवाय फलंदाजांच्या मनात धडकी भरणारी नजर. त्याचे टोपणनावही साजेसं आहे. 'जम्बो', अर्थात अनिल कुंबळे. पण जलदगती गोलंदाजी आणि कुंबळे हे समीकरण जुळत नाही. पण चेंडू त्याच्या हातात आला की फिरायला लागतो. कधी काळी त्याचा चेंडू फिरतो म्हणजे काय असे कुत्सित शब्दांत विचारले जायचे. त्याच कुंबळेने आता बळींचे शिखर गाठले आहे.
मुळात एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कुंबळेने क्रिकेटमध्ये रस घेणे जरा विचित्रच होतं. त्याला या क्षेत्रात यश मिळणे अवघड असल्याचे भाकीत त्याच्या निकटवर्तीयांनी वर्तवले होते. पण या भाकिताला खोटं ठरवत जम्बोने आपला ठसा या क्षेत्रात उमटवला. त्याचा हा प्रवास बराच किचकट होता. पण तो सहाशे बळींचा मुकूट डोक्यावर ठेवून आहे. वेगवान खेळपट्टी समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियातील वाका येथील खेळपट्टीवर त्याने हा विक्रम स्पर्शला.
त्याच्या या प्रवासात त्याला अनेक पुरस्कार मिळाले. १९९६ मध्ये त्याला 'विस्डेन'चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला. भारतीय क्रकेटच्या इतिहासात कुंबळेची सर्वांत अविस्मरणीय कामगिरी म्हणजे पाकिस्तानविरोधात त्याने मिळवलेले दहा बळी.
आख्खा पाकिस्तानी संघ एकट्या जम्बोने गारद केला होता. ४ फेब्रुवारी १९९९ चा तो दिवस अजूनही आठवत असेल.
पहिल्या डावात भारताने २५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तान पुढे ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना केवळ १७२ धावांमध्ये पाक संघ गारद झाला होता. दुसर्या डावात भारताने ३३९ धावांसह एकूण ४२० धावांचा डोंगर उभा केला. यानंतर एकट्या कुंबळेने पाकिस्तानी संघाला पाहता पाहता गारद केले. भारताने हा सामना १२२ धावांनी जिंकला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो अनिल कुंबळे.तो दिवसच एकट्या कुंबळेचा होता.
या सामन्यात कुंबळेने केवळ दहा बळीच मिळवले असे नाही तर, २६.३ षटकात त्याची ९ षटके निर्धाव होती. या सामन्यातील त्याचे दहा बळी हे होते.
कुंबळेचे टॉप टेन बळी
पहिला बळी : शाहिद आफ्रिदी (41) झेल दिनेश मोंगिया.
दुसरा बळी : एजाज एहमद (0) पायचीत
तिसरा बळी :इंजमाम-उल-हक(6) त्रिफळा
चौथा बळी : युसुफ यौहाना (0) पायचीत
पाचवा बळी : मोइन खान (3) झेलबाद गांगुली
सहावा बळी : सईद अन्वर (69) झेलबाद लक्ष्मण
सातवा बळी : सलीम मालिक (15) त्रिफळा
आठवा बळी : मुश्ताक अहमद(1) झेलबाद द्रविड
नववा बळी : सकलैन मुश्ताक(0) पायचीत
दहावा बळी : वसीम आक्रम (37) झेलबाद लक्ष्मण.