Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…

bharat sankalp yatra
, सोमवार, 18 डिसेंबर 2023 (21:24 IST)
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.
 
जनजातीय गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील 110 जिल्ह्यात सुरू करण्यात आली. यात आपल्या नाशिक जिल्ह्याचा समावेश होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून उर्वरित सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाद देखील साधण्यात येत आहे.
 
नाशिक जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत 15 नोव्हेंबर 2023 रोजी या विकसित संकल्प यात्रेचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे करण्यात आला. तर 21 नोव्हेंबर रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे कार्यक्रम संपन्न झाला.

केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेसाठी 14 एलईडी व्हॅन प्राप्त झाल्या आहेत. या प्रत्येक व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील दररोज दोन ग्रामपंचायतींमध्ये याप्रमाणे एकूण 28 गावांमध्ये शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येत आहे. याबाबतचे परिपूर्ण नियोजन या विकसित संकल्प यात्रेच्या नोडल अधिकारी तथा उप कार्यकारी अधिकारी डॉ.  वर्षा फडोळ या करीत आहेत.
 
ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.
 
आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, एकलव्य निवासी शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, वन धन विकास केंद्र आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. तर शहरी भागात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, मुद्रा कर्ज, स्वच्छ भारत अभियान (शहरी), पीएम आवास योजना, पीएम ईबस सेवा, खेलो इंडिया, सौभाग्य योजना, वंदे भारत रेल्वे, उडान आदी विविध योजनांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
 
माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन  विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत.
 
शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेती व मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.
 
जिल्ह्यात 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत साधारण 379 ग्रामपंचायतींमध्ये ही विकास यात्रा पोहचली असून  या यात्रेच्या माध्यमातून साधारण एक लाख 43 हजार 502 नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे.  या यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाणी महसूल, जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका प्रशासनासह इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करीत असून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. या यात्रेला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अश्वजीत गायकवाडचा एक दिवसांत जामीन मंजूर