Publish Date: Mon, 01 Sep 2014 (14:32 IST)
Updated Date: Mon, 01 Sep 2014 (14:35 IST)
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइं या महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या 25 वर्षापासून असलेल्या युतीत प्रथमच धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती तुटण्याच्या मार्गावर दिसत आहे. भाजप 144 जागांवर ठाम आहे. मात्र, शिवसेनेने स्पष्ट नकार दिला आहे. त्यावर भाजप नेत्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. काही होईल ते होऊ द्या, असा इशाराही प्रदेश भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाला कळवले आहे.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी (4 सप्टेंबर) मुंबईत येत आहेत. यावेळी जागावाटपाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच भाजपचे शिवसेनेवर दबावाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. भाजपला 144 जागा हव्या असल्याचे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रातील नेते नितीन गडकरी यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तसेच शिवसेना 144 जागा सोडणार नसेल तर पुढचा निर्णय घेण्यास दोन्ही पक्ष मोकळे असल्याचे सांगत भाजप आता शिवसेनेसोबत फरफटत जाणार नाही असे स्पष्ट सांगितले.
वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.