Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

वेबदुनिया

स्वातत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, धर्मसुधारक व समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची आज जयंती. त्या निमित्त..

महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 ङ्के 1883 रोजी झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या 10 व्या वर्षीच इतिहास आणि धर्मशास्त्रावरील जाडजूड पुस्तके वाचू लागले. 10 व्या वर्षी विनायकाने केलेल्या कविता तत्कालीन अग्रणी मराठी वृत्तपत्रात छापून येत असत. मात्र कवीच्या वयावर वाचकांचा विश्वासच बसत नसे. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पारतंर्त्य, गुलामी, ब्रिटिश राजवट यांचा थोडाही उपद्रव सावरकरांपर्यंत पोहचला नव्हता. पण..इतिहासाची पाने वाचत असताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवाद आकार घेत होता. उन्मत्त ब्रिटिश सत्तेशी झगडणार्‍या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. त्याच काळात रँडचा वध करून फासावर चढलेल्या चापेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकरांवर फार मोठा आघात झाला. त्याच रात्री देशभक्तीने तळमळलेल्या त्या 16 वर्षाच्या तरुणाने आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली - ‘देशाच्या स्वातंत्र्र्यासाठी शत्रूस मारिता-मारिता मरेतो झुंजेन.. जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंर्त्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल.’

webdunia
WD
पुढचा तरुण सावरकरांचा जीवनपट चित्तथरारक प्रसंगांनी भरलेला आहे. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (1905). उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ते लंडनमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या ‘इंडिया हाउस’मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल ¨धग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉम्बचे तंत्रज्ञान व 22 ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारतच्या 3 सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंर्त्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता.

सावरकरांनी आपल्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वाने व ओघवत्या वक्तृत्वाने इंग्लंड आणि भारतातल्या क्रांतिकारकांना झपाटून टाकले. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तत्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली.(1910) ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना बेकायदेशीरपणे अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे 50 वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली(1911). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण भारताच्या दुर्दैवाने तसे घडले नाही.

webdunia
WD
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खडय़ा बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. अंदमानातल्या त्या अंधार्‍या खोलीत हा तेजस्वी बॅरिस्टर किडे पडलेले अन्न खात होता आणि मचूळ पाण्याने तहान भागवत होता. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंर्त्य! तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.

बाभळीच्या काटय़ांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

webdunia
WD
जीवनाच्या या दुसर्‍या पर्वात समाजसुधारक, हिंदू संघटक, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत अशा अनेक स्वरूपांत सावरकर समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर तंना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.

हिंदू समाज संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीत केले, ते अतुलनीय आहे. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वण्र्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.

सुमारे 60 वर्षे ‘स्वातंत्र्यवीरांनी’ स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. 1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर 22 व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावरकर आणि आपण