Publish Date: Wed, 03 Jul 2019 (17:02 IST)
Updated Date: Wed, 03 Jul 2019 (17:04 IST)
पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी आलेले लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. यामुळे यात्रेत येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत यंदा १२ लाख बुंदीचे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे.मंदिर समितीने मागील वर्षीपेक्षा यंदा जादा २ लाख लाडू बनविण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे १२ लाख लाडू बनविण्याचे नियोजन सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनविता मागणीनुसारच लाडू बनविण्यात येणार आहेत. लाडू बनविण्याचे काम ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष कर्मचाऱ्यामार्फत सुरूआहे. लाडू बनवत असताना अन्न व औषध विभागाकडून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाते. यामध्ये सर्व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करुन घेणे, डोक्याला कॅप वापरणे, अंतर्गत स्वच्छता ठेवणे या सूचनांचा सहभाग आहे. केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दोन लाडूचे वजन अंदाजे १४० ग्रॅम इतके असते. हे लाडू मंदिर समितीला साडेबारा रुपयांना दिले जातात. मंदिर समिती दोन लाडूची पिशवी भाविकांना १५ रुपयांना विक्री करते. लाडू विक्रीतूनदेखील मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.