Publish Date: Mon, 08 Jun 2020 (16:27 IST)
Updated Date: Mon, 08 Jun 2020 (16:29 IST)
राज्यात जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर चारपट अधिक आहे. मागील ३० दिवसांच्या कालावधीत तब्बल ११२ जणांचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अर्थात मृत्यूदर २.८ टक्के इतका आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर आहे. १२.३ टक्के. झोप उडवणारी स्थिती जळगाव जिल्ह्यात आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या चार शहरात ४ जून पर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी महिनाभरापूर्वीचं याविषयी धोक्याचा इशारा दिला होता. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ४२ होता. तर १४ जणांचा मृत्यू झाला होता. केवळ पाच दिवसात १४ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. मृतांपैकी ६० जणांचं वय ६० पेक्षा अधिक होत. ४७ जण ५० ते ६० या वयोगटातील होते. तर ५ जण ४० ते ५० वयोगटातील होत्या. या मृत्यूमुळे जिल्ह्याचा मृत्यूदर एका महिन्याच्या काळात देशातील मृत्यूदरापेक्षा चारपट अधिक झाला आहे. राज्य सरकारनं आता प्रत्येक व्यक्तीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी १० सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.