Publish Date: Mon, 06 Jan 2020 (15:59 IST)
Updated Date: Mon, 06 Jan 2020 (16:03 IST)
मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर स्त्रियां हे धारण करतात. मंगळसूत्र हे पतीबद्दलचे प्रेम आणि आदराचे लक्षण आहे. पतीवरील सर्व संकटे दूर करण्यासाठी हे महत्वाचे असते. मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती- पत्नीचे बंधन. 2 वाट्या म्हणजे पती-पत्नी, तसेच 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे.
मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ :-
मंगलसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक आहे. शिव-शक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या पर्वांगीतील आदन- प्रदानाचे द्योत आहे.
माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मग गळ्यात घातले जाते. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणं असल्याने विवाहित स्त्रिया धारण करतात. हे मंगळसूत्र पतीच्या निधनानंतरच काढतात, त्यास हे समर्पण करतात. किंवा पतीपासून विभक्त झाल्या वर. आपसातले संबंध तुटल्यावर काढतात.
मंगळसूत्र अनेक राज्यांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते परंतु त्याचे महत्त्व सर्वत्र सारखेच आहे. मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी. येथे अनाहत चक्राचे स्थान असते. मंगळसूत्राच्या वाट्या त्या अनाहत चक्राला स्पर्श झाल्या पाहिजे. यामुळे स्त्रियांचे मन आणि चित्त शांत राहते. त्या चक्रांमधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो.