Publish Date: Wed, 03 Mar 2021 (09:21 IST)
Updated Date: Wed, 03 Mar 2021 (09:23 IST)
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर सुर्योदयापासून ते माध्यान्हापर्यंत गुडघाभर पाण्यात ऊभे राहून श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करत असत. माध्यान्ह झाल्यावर भिक्षा मागण्यास जात असत.
त्या जपकाळात नदीच्या पलीकडील काठावरच्या एका उंच झाडावर स्वामी यायच्या आधी पासूनच एक भलेमोठे वानर बसत असे, स्वामी त्याला रोज पहात. तो कोण आहे, काय आहे, हे सर्व स्वामी जाणून होते पण ते आपली साधना चालू ठेवीत, मनात त्यानाही उत्सुकता होती, पाहू किती दिवस हे असे सुरू राहते ते.
दोघेही चिवट हार मानण्यास कुणी तयार नव्हते, असा क्रम अखंड बारावर्षे चालू होता खंड न पडता. ज्या दिवशी हा मंत्रजप पूर्ण झाला त्या दिवशी त्या वानराने झाडा वरुन खाली ऊडी मारली व समर्थांजवळ महाकाय रुपात येऊन त्यांना कडकडून मिठी मारली, त्याच क्षणी स्वामींच्या मुखातुन हे दिव्य स्तोत्र बाहेर पडले, हे प्रद्न्याबुद्धीने स्फुरलेल्या स्तोत्रांमधे प्राण असतो. हे स्तोत्र पूर्ण झाल्यावर हनुमंतांनी त्याना साक्षात अख्खे दर्शन दिले तर अशी ह्या स्तोत्रामागे १३ कोटी जपाची तपस्या आहे.