Publish Date: Mon, 12 Nov 2018 (09:33 IST)
Updated Date: Mon, 12 Nov 2018 (09:36 IST)
आता जसा हिवाळा येतोय तसे वातावरण बदलत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा बदलत आहे मात्र कारण थोडे वेगळे आहे. सध्या मुंबईत सकाळी हवेत जाणवणारा गारवा, दिसणारे धुरकट वातावरण यामुळे धुकेच पसरले आहे की काय? असे वाटते. मात्र हे धुके नक्कीच नाही तर धूलिकण आणि प्रदूषण धूरमिश्रित धुरके आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पहाटे वातावरणात गारवा जाणवत असला तरी ती थंडी नाही. मुंबईत थंडीचे आगमन डिसेंबरच्या मध्यानंतरच होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईचे ‘हिवाळी’अधिवेशन लांबणार असल्याचे दिसते आहे. त्यामुळे आता मुंबई देखील दिल्लीच्या वाटेवर आहे असे दिसते. दिवाळीतील फटाक्यांमुळे सध्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्यातच वातावरणातील धूलिकण आणि धूर, आर्दतेचे वाढलेले प्रमाण यामुळे मुंबई धुरक्यात हरवली आहे. वांद्रे, अंधेरी, वरळी, प्रभादेवी, कुलाबा या भागांमध्ये पहाटे आणि सायंकाळच्या वेळी धुरक्याची जणू चादरच पसरली आहे. धुरक्यामुळे नाकातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे या लक्षणांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात मोठा प्रश्न निर्माण होणार हे मात्र नक्की.