Publish Date: Fri, 06 Jan 2017 (09:57 IST)
Updated Date: Fri, 06 Jan 2017 (09:59 IST)
महाराष्ट्र शासनासोबत बांबु प्रशिक्षण केंद्र व इतर काही प्रकल्पांबाबत सामंजस्य करार करताना मी विशेष आनंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित रूप तयार करण्याची संकल्पना जाहीर करून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. त्याचे प्रतिबिंब चंद्रपूरात बघायला मिळत आहे. या प्रक्रियेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले आहे. येथील उत्साही वातावरण बघुन मी प्रभावित झालो आहे. चंद्रपूर जिल्हा निश्चीतपणे विकास प्रक्रियेत अग्रणी जिल्हा ठरेल व या प्रक्रियेत टाटा ट्रस्ट राज्य शासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही विख्यात उद्योगपती श्री. रतन टाटा यांनी दिली.
टाटा ट्रस्ट या शिर्षकातच विश्वास असुन टाटा म्हणजे गुणवत्ता आणि प्रगती यांचे प्रतीक आहे. बांबु प्रशिक्षण केंद्राच्या सामंजस्य करारानिमीत्त श्री. रतन टाटा चंद्रपूरात आले हे आमचे भाग्य आहे. बांबुच्या माध्यमातुन रोजगार निर्मीती, कौशल्य विकासासह प्रगतीची नवनवीन शिखरे आम्ही गाठू. पाठयपुस्तकात कल्पवृक्ष हा इच्छीत मनोरथ पूर्ण करणारा वृक्ष म्हणून आम्ही वाचले आहे. याच धर्तीवर बांबु कल्पवृक्ष ठरावा अशी अपेक्षा वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
दिनांक 5 जानेवारी रोजी चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासनाचा वनविभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात बांबु प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य कराराच्या निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर विख्यात उद्योगपती श्री. रतन टाटा, वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, टाटा ट्रस्टचे मॅनेजींग ट्रस्टी श्री. व्यंकटरमनन, खा. अशोक नेते, आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे, आ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. चंदनसिंह चंदेल, वनविभागाचे सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे सचिव श्री. गिरीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह, मुख्य वनसंरक्षक श्री. शेळके, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, चिचपल्ली येथील बांबु प्रशिक्षण केंद्र, घोट येथील अगरबत्ती प्रकल्प, बांबु बोर्डसाठी 5 कोटी रू., पोंभुर्णा व जिवती तालुक्यातील कुक्कुटपालन प्रकल्पासाठी 3 कोटी रू., जिल्हयातील रोजगारासंबंधीचे सुक्ष्म नियोजन अशा विविध प्रकल्पांसाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातुन मिळणारे सहकार्य आमच्यासाठी लाख मोलाचे आहे. टाटा हे विश्वास आणि गुणवत्तचे प्रतीक असुन त्यांच्या सहकार्याने रोजगार निर्मीतीचे लक्ष्य आम्ही पूर्ण करणार आहोत. जॉब सिकर्स नव्हे तर जॉब क्रिएटर्सची संख्या आम्हाला वाढवायची आहे.
webdunia
Publish Date: Fri, 06 Jan 2017 (09:57 IST)
Updated Date: Fri, 06 Jan 2017 (09:59 IST)