भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी जानेवारी २०१२ मध्ये व्हेटो अधिकार वापरून महेंद्रसिंह धोनीचे कर्णधारपद वाचवले होते, असा खुलासा झाला आहे.
निवड समितीने धोनीस हटवून विराट कोहलीस कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय घेतला होता. निवड समिती सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीस हटविण्याची मागणी लावून धरली होती. या विरोधासाठी त्यांना निवड समितीची पुनर्रचना झाल्यानंतर बाहेरही पडावे लागले होते.
भारतीय संघाची सुमार कामगिरी होत असताना कर्णधार धोनीही निराशेच्या गर्तेत गेला होता. त्यामुळे त्याच्या मैदानावरील कामगिरीवर प्रभाव पडला होता.
या पार्श्वभूमीवर धोनीस हटविण्याचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी व्हेटो अधिकार वापरून धुडकावून लावला होता. याचा खुलासा खुद्द त्यांनीच केला आहे.