धर्मांतराबाबत सुरु असलेल्या आक्रमक व वादग्रस्त विधानांमुळे मोदी सरकारची चांगलीच कोंडी झालेली असून यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने दिल्लीतील राजकारण चांगलेच तापलेले आहे.
विहिंप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाद चिघळू लागला असतानाच गुजरातमधील आदिवासींच्या घर वापसीचा कार्यक्रम आणि दिल्लीत अशोक सिंघल यांच्या वक्तव्यामुळे याची धग आणखी वाढली.
जगभरात जी युध्दे सुरु आहेत त्याला ख्रिश्चन आणि मुस्लीमच कारणीभूत असल्याचे वक्तव्य विहिंप नेते अशोक सिंघल यांनी केले होते. आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे, तर लोकांची मने जिंकायला निघालो आहोत, असे सांगत त्यांनी ‘घर वापसी’चे समर्थन केल्याने वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, संघ परिवारातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कोंडीत सापडलेले नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिल्याचे वृत्त पुढे आले होते, मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.