Publish Date: Sat, 03 Aug 2019 (09:24 IST)
Updated Date: Sat, 03 Aug 2019 (09:26 IST)
अमरनाथ यात्रेवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर सरकारने जम्मू-काश्मीर यात्रेकरुंना, पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत माघारी परतण्याच्या सूचना दिल्या सोबतच अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे. अमरनाथ यात्रेकरु, पर्यटकांना काश्मीर घाटीत थांबण्याचा कालावधी कमी करण्यास तसेच लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सूचित केले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी अडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास व लवकरात लवकर परत जाण्यास कळवले आहे. सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कराने संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी अमरनाथ यात्रेच्या भाविकांवर स्नायपर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलाच्या जवानांनी हा हल्ला उधळून लावला, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.