Publish Date: Thu, 16 Mar 2023 (17:25 IST)
Updated Date: Thu, 16 Mar 2023 (17:28 IST)
उत्तर प्रदेशमध्ये कन्नौज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाली परिसरात वधूला बारावीत फार कमी गुण मिळाल्याचे कळल्यावर नवरदेवाने लग्नाला थेट नकार दिल्याचं समोर आलं आहे. पण वराच्या निर्णयानंतर वधूच्या वडिलांनी सांगितले की, वराच्या कुटुंबाने हुंडा पुरेसा नसल्याने लग्न रद्द केले. वधूच्या कुटुंबीयांनी वराची हुंड्याची मागणी परवडत नसल्याने लग्न रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.
आपल्या मुलीचे सोनीचे लग्न बागनवा गावातील रामशंकर यांचा मुलगा सोनू याच्याशी ठरल्याचं वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. ते म्हणाले 4 डिसेंबर 2022 रोजी लग्नासाठीचा एक छोटासा कार्यक्रम झाला. वधूच्या वडिलांनी लग्नासाठी 60,000 रुपये खर्च केले.
नवरदेवासाठी 15,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी देखील घेतली होती. काही दिवसांनी वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली. अधिक हुंडा घेऊ शकत नाही हे वधूच्या वडिलांकडून ऐकल्यानंतर, वराने तिच्या बारावीच्या निकालावर असमाधानी असल्याचे सांगून लग्न रद्द केले. तसेच होणाऱ्या जावयाने सासऱ्याला तुमची मुलगी शिक्षणात कमकुवत असल्याचं सांगितलं. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.