Publish Date: Tue, 24 May 2022 (08:00 IST)
Updated Date: Tue, 24 May 2022 (08:14 IST)
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वात भाजपचा जलआक्रोश मोर्चा सुरु झाला असून मोर्चात सहभागी होण्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीचौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर ते पैठणगेट येथे मोर्चाचे नैतृत्व करण्यासाठी पोहचले आहेत. यावेळी या आक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टिका केली. संभाजीनगरला पाणी मिळाल्याशिवाय आमचा जलआक्रोश संपणार नाही असे देखील फडणवीस म्हणाले.
कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही
फडणवीस म्हणाले, वर्षानुवर्षे सातत्याने औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेचे (shivsena) वर्चस्व आहे. ''मी मुख्यमंत्री असताना योजना मंजूर करुन 1680 कोटी रुपये दिले. त्यात बदल करुन साडे सहाशे कोटी रुपये महापालिकेने द्यावे असे राज्य सरकारने सांगितले. पण औरंगाबाद महापालिकेकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाही. केंद्राच्या निधीवरच हा प्रकल्प पुढे नेला जात असल्याचे टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संघर्ष सुरुच राहणार
औरंगाबादचा पाणीप्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करीत राहू असेही फडणवीस म्हणाले. नागपूरातील पाणी प्रश्नावर नाना पटोलेंचे वक्तव्यावर फडणवीस म्हणाले की, नाना पटोले खोटे बोलत आहे त्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर देण्याची गरज नाही. नागपूरचा पिण्याच्या पाण्यात कितवा क्रमांक आहे ते त्यांनाही माहित असल्याचे ते म्हणाले.
हा जन आक्रोश मोर्चा आहे, जनतेचा हा असंतोष आहे - रावसाहेब दानवे
मोर्चा जरी भाजपने काढला असला तरी या मोर्चात सहभागी झालेले जे लोक आहेत संभाजीनगरवासी आहेत, हा जन आक्रोश मोर्चा आहे, जनतेचा हा असंतोष आहे, जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याविरोधात हा मोर्चा आहे, या मोर्चाची दखल घेऊन राज्य सरकारने फडणवीसांच्या काळात १६८० कोटी रुपयांची योजना मंजूर झाली होती, तिला त्वरीत मान्यता देऊन कामाला सुरूवात करावी..