Publish Date: Fri, 18 May 2018 (15:45 IST)
Updated Date: Fri, 18 May 2018 (15:46 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूल येथील शेतातून तब्बल १७० शेळ्या चोरीला गेल्या आहेत. मूल शहरात कुरमार मोहल्ल्यात कुरमार समाज वास्तव्याला आहे. शेळी आणि मेंढीपालन हे त्यांचे परंपरागत व्यवसाय आहेत. या समाजातील पोचू बिरा कटकेलवार याने बुधवारी या १७० शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. या शेळ्या दिवाकर कटकेलवार आणि सुखदेव कंकलवार या दोघांच्या होत्या. संध्याकाळी चरून परत आलेल्या या शेळ्यांना पोचूने त्याच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील जाळीमध्ये बांधलं होतं. हे शेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वडिलोपार्जित शेत आहे.
मात्र, या शेळ्या रात्री दहा वाजताच्या सुमाराला तिथून गायब झाल्याचं पोचूच्या लक्षात आलं. जाळीच्या कुंपणात बंदिस्त असलेल्या शेळ्या गायब झाल्याने पोचूने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याला शेळ्यांचा काहीही थागंपत्ता लागला नाही. शेळ्यांची चोरी झाल्याचं लक्षात येताच त्याच्यासह कुरमार समाजातील इतरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.