Publish Date: Mon, 04 Feb 2019 (12:56 IST)
Updated Date: Mon, 04 Feb 2019 (12:59 IST)
ज्येष्ठ साजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी केला असतानाच आता शिवसेनेनेही अण्णांना पाठिंबा दिला आहे. सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून त्यांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले.
अण्णांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून यकृतावर परिणाम झाला आहे. त्याबद्दल उद्धव यांनी चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी अण्णांच्या आरण उपोषणास शुभेच्छा देणारे पत्र पाठवणे हे संतापजनक आणि तितकेच हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले.
अण्णांचा लढा भ्रष्टाचारविरोधी आहे. संपूर्ण देशाची ही समस्या आहे. पण अण्णांनी उपोषण करून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढा द्यावा आणि देशाला जाग आणावी, असेही ते म्हणाले. सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढायला हवे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वार येथे प्राध्यापक अग्रवाल उपोषणास बसले होते. त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरू दिले. देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे आणि लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले.