Publish Date: Fri, 03 Mar 2023 (21:30 IST)
Updated Date: Fri, 03 Mar 2023 (21:35 IST)
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीचा पेपर बुलढाण्यात फुटला. बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून सातत्याने विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. यावरून माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरलं. तसंच, हे सरकार झोपलं आहे का असा सवालही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.
बारावीचा गणिताचा पेपर होता. सकाळी ११ वाजता पेपर सुरू होण्याच्या अर्धातास आधीच बुलढाण्यात पेपर फुटला. ही माहिती विरोधी पक्षनेते यांना कळताच त्यांनी लागलीच विधानसभेत याची माहिती देऊन संताप व्यक्त केला. “गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला. अभ्यास करणाऱ्या मुलांचं यामुळे किती वाटोळे होते. सरकार झोपलंय की काय, काय चाललंय कळत नाही. मी बोललो की बोलता दादा दादा बोलतात,” अशा संतापलेल्या सुरात त्यांनी सरकारला धारेवर धरलं.
अजित पवारांनी पेपरफुटीचा मुद्दा मांडताच माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात गोंधळ केला. या सरकारच्या काळात परीक्षा सुरू झाल्यापासूनच सातत्याने समस्या सुरू आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरात दोन दोन गुणांचे तीन प्रश्न चुकीचे आले. त्यानंतर मराठीच्या पेपरएवजी इंग्रजीचा पेपर मुलांना मिळाला. आता तिसरी घटना म्हणजे बुलढाण्यात पेपर अर्धातास आधीच फुटला आहे. हे सरकार नक्की करतंय काय? कॉपीमुक्त परीक्षेसाठी यांनी भरारी पथक नेमले, मोबाईल निषिद्ध केले, दहा मिनिटे आधी पेपर द्यायचा हे ठरवलं गेलं. मग तरीही अर्धा तास आधी पेपर बाहेर गेला कसा? हे पहिल्यांदाच घडलं नाहीय”, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor