Publish Date: Mon, 14 Feb 2022 (08:24 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (20:20 IST)
कुत्र्यांची, अन्य पशू-पक्ष्यांची जनगणना होते. मात्र, ओबीसी समाजाची स्वतंत्र गणना होत नाही. आरक्षण हा दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. शोषितांना आरक्षण मिळाले, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर महाराष्ट्रात का नाही, अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीने राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती भाषण केलं. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, राष्ट्रवादीचे ठाणे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, शहराध्यक्ष गजानन चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन चक्क ढोल वाजवित मंचावर प्रवेश केला. जातीचा अभिमान केव्हा येतो, जेव्हा तुम्हाला जात समजते तेव्हा. दुर्देवाने ओबीसींना सर्व हातात मिळालं. त्यामुळे त्यांना जातच समजली नाही. ज्यांना समजली ते पुढे गेले. पण ३५४ जाती आहेत. त्यापैकी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या फक्त १६ ते १७ जाती आहेत. बाकी आजही सर्व जाती दऱ्याखोऱ्यात पाल्यावस्त्यात राहतात. त्यांना बाहेर काढून त्यांची शैक्षणिक प्रगतीची करण्याची गरज आहे. ती गरज भागविण्यासाठीच मी तुम्हाला एकत्रं केलं आहे. त्यात माझा कोणताही राजकीय हेतू नाही, असं आव्हाड यांनी सांगितलं.