Publish Date: Fri, 07 Jun 2019 (17:07 IST)
Updated Date: Fri, 07 Jun 2019 (17:10 IST)
राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार पुणे आणि जळगावच्या पालकमंत्र्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळे गिरीश बापट हे खासदार बनले आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गिरीश बापट यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह, अन्न व औषध पुरवठा आणि संसदीय कामकाजमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. आता, मंत्रीमंडळातील फेरबदलानुसार, अन्न व औषध पुरवठा विभागाचा भार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, संसदीय कामकाममंत्रीपदाची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिली आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्याकडून जळगावचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाजन यांच्याकडे जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे म्हटले आहे.