Publish Date: Fri, 28 Feb 2020 (10:12 IST)
Updated Date: Fri, 28 Feb 2020 (10:17 IST)
राज्याच्या तापमानात सध्या झपाट्यानं बदल आहे. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. कोकण विभाग वगळता राज्याच्या इतर भागांत सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्यानं थंडी पुन्हा अवतरलीय.
उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने पुन्हा येऊ लागलेत. किनारपट्टीच्या भागात मात्र उष्ण वाऱ्यांचे प्रवाह आहेत. परिणामी कोकण विभागात सध्या कमाल तापमानात वाढ झालीय. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी वाढलाय. मुंबईत गुरुवारी मोसमातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.
गेल्या तीन वर्षांतलं ते सर्वाधिक तापमान आहे. तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १६ ते १७ अंशांवर गेलेले किमान तापमान दोन दिवसांपासून १२ ते १३ अंशांवर आलंय. कमाल तापमानही सरासरीखाली आल्यानं उन्हाचा पारा घसरलाय. नाशिकमध्ये राज्यातल्या नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.