Publish Date: Tue, 08 Feb 2022 (15:30 IST)
Updated Date: Tue, 08 Feb 2022 (15:32 IST)
मोदींच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे उत्तर कामगारांना घेऊन सर्वाधिक 1033 श्रमिक रेल्वे गुजरातमधून सोडण्यात आल्यात. तर महाराष्ट्रातून 817 रेल्वे कामगारांना घेऊन इतर राज्यात गेल्या आहेत, हे सांगताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाने दिलेली आकडेवारी दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील मजूर बाकीच्या राज्यांमध्ये गेल्याने कोरोना वाढला, असे ते म्हणाले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.
सुळे यांनी पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्राविषयी केलेल्या वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे. लॉकडाउनचा निर्णय घेण्याबाबत मोदी यांनी नंतर बघू म्हणाले होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. कोण कोविड सुपर स्पेडर आहे, याचे प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे. लॉकडाउनच्या आधी लोकसभेचे कामकाज सुरु होते. त्यावेळी तृणमूलचे खासदार सौगता रॉय संसद सुरू असताना स्वतः पंतप्रधानांकडे चालत गेले आणि कोविड पसरत असल्याने कामकाज लवकर संपवले पाहिजे, असे सगळ्यांचे मत आहे, असे म्हटले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी काय करायचे ते नंतर बघू असे म्हणाले. कारण मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यात हे सगळे व्यस्त होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.