Publish Date: Thu, 10 Oct 2019 (11:25 IST)
Updated Date: Thu, 10 Oct 2019 (11:29 IST)
देशात होणाऱ्या मॉब लिचिंगविरोधात (झुंडबळी) पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून आवाज उठवणाऱ्या 49 सेलिब्रेटीविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खटला रद्द करण्यात आला आहे.
मुझफ्फरपूरच्या पोलीस अधीक्षकांनी गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये लेखक रामचंद्र गुहा, चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि अनुराग कश्यप, अभिनेत्री अपर्णा सेन यांचा समावेश आहे.
स्थानिक वकील सुधीरकुमार ओझा यांनी या सेलिब्रेटिंविरोधात बिहारच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मुझ्झफरपूरचे मुख्य न्याय दंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी दोन महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल करुन घेतली होती.
त्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी ओझा यांनी म्हटलं होतं की, "सीजेएम तिवारी यांनी 20 ऑगस्टला माझी याचिका दाखल करून घेतली होती. याची जी पावती देण्यात आली होती, त्याआधारे आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे."