Publish Date: Tue, 29 Oct 2019 (10:29 IST)
Updated Date: Tue, 29 Oct 2019 (10:33 IST)
मुख्यमंत्रिपदासाठी सेनेच्या आग्रहाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उद्देशून फेसबुक पोस्ट लिहिलीय. ही फेसबुक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झालीय.
मुख्यमंत्रिपदाच्या संधीबाबत सत्यजित तांबे यांनी आदित्य यांना उद्देशून म्हटलंय, "राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती."
हे सांगत असताना सत्यजित तांबे यांनी 2007 साली झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अनुभवही कथन केला. त्यावेळी आपलं अध्यक्षपद कसं हुकलं, हे सांगताना सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाबाबत सल्ला दिलाय.