Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई लोकसभा निवडणूक: मतदान कसं करतात? निवडणुकीविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही

मुंबई लोकसभा निवडणूक: मतदान कसं करतात? निवडणुकीविषयी जाणून घेण्यासारखं सर्वकाही
, सोमवार, 29 एप्रिल 2019 (09:49 IST)
देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. 29 एप्रिल रोजी मुंबईसह महाराष्ट्रातल्या 17 मतदारसंघात मतदान होणार आहे.
 
पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते हे जाणून घ्या.
 
सगळ्यांत आधी, तुमचं वय काय आहे? मतदानासाठी तुमचं वय किमान 18 वर्षं पूर्ण असलं पाहिजे. मतदार म्हणून तुमची नोंदणी झाली की त्यानंतर तुम्ही मतदान केंद्रात जाऊ शकता.
मतदान केंद्रात गेलात की तुम्हाला लहान-लहान गटांमध्ये आत सोडलं जाईल.
तुमचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक या कागदपत्रांच्या आधारे तुमची ओळख तपासून पाहील.
त्यानंतर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर लगेच न पुसली जाणारी शाई लावेल.
त्यानंतर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल. यानंतर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील.
त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMच्या कंट्रोल युनिटवरील 'बॅलट' बटण दाबेल.
आता तुम्ही मतदान करायला तयार आहात.
तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करण्यासाठीच्या कप्प्याकडे जायला सांगतील. तिथं तुम्हाला मतदान ईव्हीएमचे बॅलेटिंग युनिट दिसेल, यावर तुमचे मत नोंदवले जाईल.
अरे हो, पण थांबा! हे इलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन म्हणजे आहे तरी काय?
या मशीनवर उमेदवारांची नावं आणि त्यापुढे त्यांचं निवडणूक चिन्ह असतं. तिथेच एक बटण असतं.
उमेदवारांची नावं त्या मतदारसंघातली प्रचलित भाषा आणि लिप्यांमध्ये लिहिलेली असतात.
अशिक्षित मतदारांना कळावं यासाठी प्रत्येक उमेदवारापुढे त्याचं निवडणूक चिन्हं असतं.
आता ज्या उमेदवाराला मत द्यायचं असेल त्याच्या नावासमोरील निळं बटण दाबा.
पण बटण काही वेळ तसंच दाबून ठेवा... अजून तुमचं मत नोंदवलं गेलेलं नसतं.
ज्यावेळेस तुम्हाला एक बीप ऐकू येते आणि कंट्रोल युनिटमधला लाईट बंद होतो, तेव्हा तुमचं मत नोंदवलं जातं.
तुम्ही यशस्वीरीत्या मतदान केलं आहे.
मतदान अधिकाऱ्यांनी EVMवरील "Close" बटण दाबलं की मशीन पुढे नवीन मतं नोंदवणं थांबवेल.
मतदान यंत्राशी छेडछाड होऊ नये म्हणून ते जुन्या पद्धतीने म्हणजे मेणाने सील केलं जातं. त्यानंतर त्यावर निवडणूक आयोगाकडून आलेली एक सुरक्षा पट्टी लावून सीरियल नंबर लिहिला जातो. मतमोजणीच्या वेळीच ते उघडलं जातं.
मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करण्यापूर्वी कर्मचारी आणि एजंट्स स्वतः प्रत्येक ईव्हीएम तपासणी करतात.
ही सर्व प्रक्रिया 'रिटर्निंग अधिकाऱ्याच्या' निरीक्षणाखाली सुरू असते.
मतदान यंत्राशी काहीही छेडछाड झालेली नाही, याची खात्री पटली की रिटर्निंग अधिकारी 'रिझल्ट' बटण दाबतो.
कंट्रोल युनिटमध्ये दाखवलेल्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या सर्व मतांची बेरीज केली जाते.
पूर्ण समाधान झाल्यावर ते निकालपत्रावर स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करतात.
त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निकाल त्यांच्या वेबसाईटवर रिअल टाईम प्रसिद्ध करतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुटखा खाऊन थुंकला सीसीटीव्हीत कैद त्या इसमाला झाला दंड