Publish Date: Fri, 02 Aug 2019 (13:59 IST)
Updated Date: Fri, 02 Aug 2019 (14:01 IST)
राज ठाकरे यांची ईडीद्वारे चौकशी होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्यामुळे मला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
"मला ईडीच्या चौकशीचा काही फरक पडक नाही, तुमच्याकडूनच मी या बातम्या ऐकत आहे, अजून ते काही मला हॅलो करायला घरी आलेले नाहीत," असं राज ठाकरे यांनी ईडीच्या चौकशीबाबत होत असलेल्या चर्चांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.
येत्या विधानसभा निवडणुका बॅलटपेपरवर घेण्याची मागणी करण्यासाठी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी राज्यातल्या सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
यावेळी राज्यातल्या सर्व विरोधीपक्षांनी एकमुखानं ईव्हीएमला विरोध केला आहे.
ईव्हीएमला विरोध करण्यासाठी 21 ऑगस्टला या सर्व विरोधकांनी मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे.
हे आंदोलन कुठल्याही एका पक्षाचं नाही, या आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह नसेल, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
"आम्ही महाराष्ट्रात घराघरात जाऊन फॉर्म भरून घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे फॉर्म देणार आहोत," असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. "ज्या अमेरिकेत गोंधळ सुरू आहे, त्या अमेरिकेत इव्हीएमची चिप बनते त्यावर आमच्या जनतेने विश्वास कसा ठेवायचा?"
तर 15 ऑगस्टला ग्रामसभांमध्ये ईव्हीएमविरोधात ठराव मंजूर करण्याचं राजू शेट्टी यांनी आवाहन केलं आहे.
इव्हीएमवर आमचा विश्वास नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
भाजपला जिकण्याचा विश्वास आहे तर मग ते बॅलटपेपरवर निवडणुका का घेत नाहीत असा सवाल विरोधकांनी केला आहे.