Publish Date: Fri, 08 Nov 2019 (12:23 IST)
Updated Date: Fri, 08 Nov 2019 (12:24 IST)
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा प्रचंड वाढला आहे. फुटीची शक्यता पाहता इतर पक्षांनी आपल्या पक्षातील आमदारांशी संपर्क साधू नये, याची काळजी राजकीय पक्ष घेत आहेत. याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"आम्ही कोणाचे आमदार फोडत नाही. आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही," असं पाटील यांनी म्हटलं. ही बातमी सकाळनं दिली आहे.
पाटील यांनी म्हटलं, की गेल्या पाच-दहा वर्षांत भाजपमध्ये आलेले लोक भाजपची कार्यपद्धती, विकासाची दृष्टी पाहून आले आहेत. आम्ही कोणालाही कोणतेही आमिष दाखवले नाही, कोणालाही ईडीची धमकी दिली नाही.
"लोकांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण जनादेश किंबहुना स्पष्ट जनादेश देऊनही सरकार स्थापनेला विलंब होत आहे. जनतेसाठी ही धक्कादायक बाब आहे. यातून लवकरात लवकर काही तरी मार्ग काढावा लागेल," असंही पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर ते फक्त भाजपचं पाप असेल, अशी प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.